Friday, June 1, 2012

प्रेस नोट : दुष्काळ चिंतन शिबिर

प्रेस नोट 

दुष्काळ चिंतन शिबिर

दुष्काळी परिस्थिती मुळे मानवी विकासावर होणा-या दुरगामी परिणामांवर चर्चा करण्यासाठी सांगोला येथे महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुष्काळ म्हणजे केवळ चारा पाणी एवढ़ाच तत्कालीन स्थितिचा विचार होतो. परंतु दुष्काळी भागातील शिक्षण, स्थलांतर, जीवनाधार अशा मानवी विकासावर दुरगामी परिणाम होतो त्याचा विचार होत नाही. उत्पन्नाची साधने असणारा आहेरे वर्ग यात तग धरून राहतो. परंतु साधनहीन माणसांच्या जीवन संघर्षा वर आज चर्चा ही होताना दिसत नाही.
दुष्काळी भागात मुलांचे व माणसांचे कुपोषण आहे हे शासनाच्या आकडेवारीने सिद्ध झाले आहे. स्थलांतरित कुटुंबातील मुले शिक्षणा तुन बाहेर फेकली जातात. गावा गावात पदवीधर होण्याचे मुलींचे प्रमाण नगण्य आहे. ८०% वर्ग हा मजूर आहे. बांधकाम मजूर, ऊसतोडनी मजूर, शेत मजूर, ड्रायव्हर आणि अन्य क्षेत्रातील अकुशल मजूर विकसित क्षेत्राला पुरविनारा मानदेश, पश्चिम महाराष्ट्राच्या विकसित बेटांच्या प्रकाशात अंधारलेलालच आहे.
गेल्या काही वर्षात दुष्काळ म्हणजे जनावरांना चारा माणसांना पिण्याचे पाणी आणि कृष्णा खो-या तिल पाण्याची मागणी या पुरतिच राजकीय चळवळ आहे. त्यात दुधाच्या जनावरांची काळजी पण शेळ्या, मेंढ्या या सारख्या लहान जनावरांचा विचार होत नाही. पाण्यापासून वंचित असलेल्या भागात समन्यायी पाणी वाटपाचा आग्रह धरला जात नाही. व प्रत्येक माणसांच्या जीवनधारा साठी रोजगाराचा मुद्दा राजकीय होत नाही. दुष्काळात मानवी विकासाचा व पर्यावरणाचा -हास होत आहे त्यावर शासनाला, समाजाला व सामाजिक संस्थांना काय करता येईल. या साठी दिनांक ९ जून रोजी २०१२ . दुष्काळ चिंतन शिबिराचे आयोजन सांगोला येथील समर्थ मंगल कार्यालयात केले आहे. सकाळी १० ते ५ या वेळेत होणा-या चर्चेत विकास सहयोग प्रतिष्ठान चे दत्ता पाटील व मोहन सुर्वे, समन्यायी पाणी वाटप चळवळीचे डॉ. भारत पाटणकर, टाटा समाज विज्ञान संस्थेचे डॉ. संपत काळे, लोक राजनिति मंच चे मानव कांबळे व एम. आर. खान, रोजगार हमी योजनेचे अभ्यासक डॉ. विजय माने, महिलांच्या प्रश्नावरील अभ्यासिका लता प्रतिभा मधुकर, मनीषा शिरोडकर, डॉ. अशोक गायकवाड, अर्जुन जगधने इ. लोक आपले विचार मांडणार आहेत. या चिंतन शिबिराचे उद्घाटन मा. गणपतराव देशमुख करणार आहेत. त्याच बरोबर माजी आमदार शहाजी बापू पाटिल, आमदार दीपक साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत देशमुख, डॉ. कृष्णा इंगोले हेही मार्गदर्शन करणार आहेत. सांगली, सातारा आणि सोलापुर जिल्ह्यातील वैचारीक कार्यकर्त्याना एकत्र करण्यासाठी ललित बाबर, दत्ता पाटिल (मंगळवेढा), कुमुद नास्टे (विटा), अशोक भोसले (फलटण), यांनी दुष्काळी भागातील सामाजिक चळवळ उभारण्यात पुढाकार घेतला आहे.
या शिबिरात विचारवंत सामाजिक राजकीय कार्यकर्त्यानी सहभागी व्हावे असे अवाहन डॉ. आम्बेडकर शेती विकास व संशोधन संस्था यांनी केले आहे.

No comments: